Thursday, September 30, 2021

मराठ्यांचा सेनापती, बनवा द ब्वान्य !


भारत आणि फ्रान्स यांच्यात घनिष्ठ ऐतिहासिक संबंध आहेत. आणि त्यापैकी काही ऐतिहासिक घटना तर फारच आश्चर्यकारक आहेत आणि तरीही अगदी क्वचितच त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतात. अलीकडेच मला प्रसिद्ध “La Fontaine des Éléphants” किंवा “la Colonne de Boigne“ किंवा, “Les Quatre sans Culs” या स्मारकाला भेट देण्याची संधी मिळाली. हे स्मारक १८३८ मधे फ्रांस मधील शॉबेरी (Chambéry) या शहरात, अत्यंत धाडसी आणि पराक्रमी सैन्य सेनापती बनवा द ब्वान्य (Benoît de Boigne) याच्या सन्मानार्थ उभारण्यात आले होते. या सेनापतीने अठराव्या शतकाच्या शेवटी अवघा उत्तर आणि वायव्य भारत आपल्या कर्तुत्ववाने गाजवला होता.

१७.६५ मीटर उंचीच्या या स्मारकाचे तीन भाग आहेत: एक कारंजा (चार हत्ती, चार वेगवेगळ्या दिशांना तोंड करून असलेले), एक स्तंभ (ताडवृक्षाच्या खोडाप्रमाणे) आणि वरच्या बाजूला Benoît de Boigne चा पुतळा. हत्तींच्या वर या नायकाच्या जीवनाची, भारतात आणि शॉबेरीतील कोरलेली दृश्ये तसेच त्याने ज्या मराठ्यांच्या बाजूने लढा दिला त्यांची अनेक शस्त्रे आणि चिन्हे आहेत. या स्मारकावर गणेश आणि बुद्ध या देवताही दिसतात.

बनवा लब्वार्न्य (Benoît Le borgne) ने (त्याने भारतात असतांना आपले आडनाव de Boigne असे बदलून घेतले) भुसा (fur) भरलेल्या प्राण्यांचा व्यापार करणाऱ्या कुटुंबात (८ मार्च १७५१ रोजी शॉबेरी, फ्रान्स येथे) जन्म घेतला. शॉबेरीत त्यांचे एक कौटुंबिक दुकान होते. आपल्या वडिलांच्या दुकानातील सिंह, हत्ती, चित्ता, वाघ इत्यादी जंगली प्राण्यांचे भुस्यातील पुतळ्यांचे तरुण de Boigne ला खूप आकर्षण वाटे. आणि तेव्हाच ज्या देशांतून हे अद्भुत प्राणी आलेत त्या देशाला भेट देण्याची इच्छा त्याच्यात रुजली.

De Boigne ने वयाच्या सतराव्या वर्षी फ्रेंच राजा लुई पंधरा (Louis XV) च्या आयरिश रेजिमेंटमध्ये एक साधा सैनिक म्हणून आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात केली. येथेच त्याने लष्करी कौशल्ये तसेच इंग्रजी भाषा अवगत केली. हे रेजिमेंट बहुतेक ब्रिटिशांशी शत्रुत्व असलेल्या आयरिश सैनिकांनी बनलेले होते. १७७३ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी de Boigne रशियन-तुर्क युद्धात ग्रीस मधील पारोस बेटावर रशियनांच्या बाजूने लढण्यासाठी गेला. त्याच्या दुर्दैवाने या युद्धात रशियाचा पराभव झाला आणि तो तुर्कांच्या तावडीत सापडला. त्याला गुलाम म्हणून कॉन्स्टंटिनोपल येथे आणण्यात आले. काही काळाने जेव्हा त्याच्या मालकाने त्याची इंग्रजी बोलण्याची क्षमता ओळखली तेव्हा त्याने एका इंग्रज व्यापारी लॉर्ड अल्जेरनोन पेर्सी (Lord Algernon Percy) सोबत बोलणी करण्यास त्याला नियुक्त केले. एक युरोपियन एका तुर्काचा गुलाम झालेला पाहून आश्चर्यचकित झालेल्या Percy ने de Boigne ला मुक्त करण्यासाठी आवश्यक तो खटाटोप केला.

त्यानंतर de Boigne ने ग्रीक बेटांवर Percy साठी मार्गदर्शक म्हणून काही काळ काम केले आणि शेवटी ते दोघे पारोसला पोहोचले तेव्हा त्याने तेथे ही नोकरी सोडली. त्यानंतर तो तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावरील स्मिर्न (Smyrne) या शहरी गेला आणि जिथे तो भारतातून येणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांना भेटला. त्या व्यापाऱ्यांनी त्याला गोलकोंडाच्या विलक्षण हिऱ्याच्या खाणी आणि सिलॉन (श्रीलंका) येथील मौल्यवान नीलमांबद्दल सांगितले. आणि त्यांनी त्याला असेही सांगितले की बरेच भारतीय राजे आपल्या सैन्याचे आयोजन आणि प्रशिक्षण करण्यासाठी युरोपियन लष्करी अधिकाऱ्यांच्या शोधात आहेत. त्या काळात बऱ्याच युरोपियन अधिकाऱ्यांनी आपला लष्करी अनुभव देऊन भारतात नशीब कमावले होते. शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत, विशेषत: तोफांच्या उत्पादनात तसेच नवीन युद्ध धोरणे / डावपेच अंमलात आणण्यात त्यांना गती होती.

या माहितीने उल्हसित झालेल्या de Boigne च्या डोक्यात आता अफगणिस्तान किंवा काश्मीरमधून भारतापर्यंत भूमार्ग शोधण्याची कल्पना शिरली. शिफारशींची पत्रें तसेच आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी त्याने Catherine II (रशिया) सह अनेक राजे आणि मान्यवरांशी या मोहिमेबद्दल चर्चा केली. विशेषत: राणी Catherine ने या मोहिमेत खास रस घेतला जेणेकरून तिचा प्रभाव अफगाणिस्तानपर्यंत वाढेल शिवाय कदाचित पुढे भारतातील ब्रिटिशांशीही प्रतिकार करता येईल. १७७७ मध्ये de Boigne ने आपला प्रवास सुरू केला. पण प्रवासातील काही कठीण अनुभवांनंतर त्यांने ही योजना सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्याने भारतापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्रमार्ग स्वीकारला. तथापि, इजिप्तच्या आसपास त्याचे जहाज वादळात सापडले. आणि त्यात त्याने शिफारशींच्या मौल्यवान पत्रांसह आपले सगळे सामान गमावले. परत फिरता येण्याची शक्यता नसल्याने तो स्थानिक (इजिप्तमधील) ब्रिटिश वाणिज्य दूतावासात गेला जिथे त्याला ईस्ट इंडिया कंपनीसाठी जाऊन काम करण्याचा सल्ला देण्यात आला आणि या संदर्भात त्याला शिफारशीचे एक पत्र मिळाले.

१७७८ मध्ये तो मद्रासमध्ये आला. या विदेशी भूमीतील लोक, त्यांच्या चालीरीती बघून आश्चर्यचकित झाला. पुढे आपल्या उदरनिर्वाहासाठी त्याने तलवारबाजीचे (Fencing) धडे देण्यास सुरुवात केली. अखेर त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या बटालियनला प्रशिक्षण देण्याचे काम मिळाले. चार वर्षे हा अनुभव घेतल्यानंतर आपली महत्त्वाकांक्षा पुरविण्यासाठी भारतातील इतर प्रदेशांमध्ये जाण्याचे त्याने ठरवले. त्यानंतर तो गव्हर्नर Warren Hastings याला भेटण्यासाठी कलकत्त्याला गेला. भारत आणि युरोप दरम्यानच्या भूमार्गाचा शोध घेण्याचे आपले स्वप्न त्याने पुन्हा मांडले. Warren Hastings ने त्याला नबाब असद-उद-दौला (औंध राज्याचा ब्रिटिश मांडलिक) साठी शिफारसपत्र दिले. तेव्हा de Boigne ने १७८३ मध्ये या प्रवासाला सुरुवात केली. लखनौ येथे नबाबची भेट घेतली आणि काबूल आणि कंधारमधील त्याच्या भविष्यातील भेटींसाठी शिफारशींची पत्रे आणि काही मुबलक मिळवली. लखनौ मधील आपल्या काही महिन्यांच्या वास्तव्यात त्याने हिंदी आणि पर्शियन शिकण्यास सुरवात केली. येथेच त्याने आपले आडनाव Leborgne बदलून de Borgne असे केले. त्याच्या असे लक्षात आले की ब्रिटिशांना त्याच्या आडनावातील "R" अक्षराचा उच्चार करण्यात अडचण येते.

De Boigne ने आपला प्रवास नव्याने सुरू केला आणि दिल्लीला जाऊन तो मुघल सम्राट शाह आलमला भेटला. मात्र, या भेटीच्या अवघ्या दुसऱ्या दिवशी तेथील राजकीय परिस्थिती बदलली आणि मराठा सेनापती महादजी शिंदेने स्वत:ला दिल्ली आणि आग्रा प्रांताचा प्रमुख म्हणून घोषित केले. अशा प्रकारे मुघल सम्राट शाह आलम केवळ नावापुरताच सम्राट उरला. याचे कारण म्हणजे 'मुघल' राजघराण्याचा त्याकाळी इतका प्रचंड दबदबा होता की त्या साम्राज्याचे सामर्थ्य नष्ट झालेले असूनही इतर कोणत्याही भारतीय राजाने त्याची जागा घेण्याचे धाडस केले नाही. 

महादजी शिंद्यांनी de Boigne ला बैठकीसाठी आमंत्रित केले. पण बैठकीपूर्वी de Boigne च्या ध्यानात आले की शिंद्यांच्या मार्फत त्याचे सगळे सामान चोरीला गेले आहे, ज्यात त्याची काबूल आणि कंधारसाठीच्या शिफारशींची मौल्यवान पत्रेंही होती. या बैठकीत शिंद्यांनी de Boigne च्या भारत-युरोप दरम्यान जमिनी मार्गाच्या शोध मोहिमेबद्दल आपली भीती व्यक्त केली. ही मोहीम म्हणजे भविष्यातील अफगाण आक्रमणाची योजना तर नसेल ना? त्याऐवजी de Boigne ने आपल्यासाठी काम करावे असा महादजीने प्रस्ताव मांडला जो de Boigne ने नाकारला. शिंद्यांचा शत्रू, जयपूरचा राजा या घडामोडींवर लक्ष ठेवून होता. त्याने de Boigne ला त्याच्या दोन बटालियनचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रण दिले. मात्र एकदा बटालियन तयार झाल्यावर त्या राजाने de Boigne ला कोणताही मोबदला न देता बडतर्फ केले!

दरम्यान, de Boigne ने युरोपियन शैलीच्या बटालियन प्रशिक्षित केल्याच्या बातमीने प्रभावित होऊन महादजीने त्याच्याशी नव्याने संपर्क साधला. यावेळी त्याने शिंद्यांकडील नौकरी स्वीकारली. दोन बटालियनना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली. यांत एकत्रितपणे १७०० सैनिकांचा समावेश होता. तसेच आग्रा येथे तोफखाना चालविण्याची जबाबदारीसुद्धा त्याच्या खांद्यावर टाकण्यात आली. १७८४-१७८८ दरम्यान मराठा, मोगल, राजपूत आणि राठोड (मारवाड/जोधपूर आणि बिकानेरचे राजपूत) यांच्यात अनेक लढाया झाल्या. या सगळया लढायांमध्ये de Boigne च्या प्रभावशाली भूमिकेमुळे मराठ्यांचा विजय झाला. यानंतर मात्र de Boigne ने केवळ घोडेस्वारांऐवजी १०००० सैनिकांसह एक बारूद आणि तोफखानाने मजबूत बटालियन निर्मितीचा प्रस्ताव शिंद्यांपुढे मांडला ज्याला शिंद्यांनी नकार दिला. या नकारानंतर de Boigne ने राजीनामा दिला आणि तो पुन्हा लखनौला परत गेला. येथे त्याने व्यापार करून बरीच संपत्ती मिळविली. आणि इथेच त्याने एका मुघल सुभेदाराच्या मुलीशी, नूरशी लग्न केले.

संपूर्ण उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारत काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा मनी बाळगून १७८८ मध्ये शिंद्यांनी पुन्हा de Boigne शी संपर्क साधला. यावेळी त्याने त्याला मुख्य सेनापतीचे (शिंद्यांच्या खालोखाल) पद आणि १२००० सैनिकांची फलटण तयार करण्याचे काम देऊ केले. या फलटणीच्या खर्चाच्या तजवीजेसाठी महादजीने त्याला दिल्ली ते लखनौ च्या दरम्यान एक मोठी जहागीर (जमिनीचा तुकडा) भेट दिली. शिंद्यांना एक वार्षिक रक्कम देऊन या क्षेत्राचे प्रशासन सांभाळण्याचे संपूर्ण अधिकार de Boigne ला मिळाले. त्याने आपल्या सेवेमध्ये अनेक युरोपियनांना नोकरी दिली, फ्रेंच अधिकृत भाषा म्हणून निवडली आणि Savoyarde चा झेंडा (फ्रान्समधील त्याचा मूळ प्रदेश) आपल्या प्रदेशाचा झेंडा म्हणून अंगीकारला. लष्कराची अनेक नाविन्यपूर्ण शस्त्रे आणि रणनीती अमलात आणण्याबरोबरच त्याने आपल्या सैन्यातील तसेच शत्रूच्या जखमी सैनिकांसाठीही खुला असलेला एक (वैद्यकीय) रुग्णवाहिका विभाग सुरू केला. शत्रूच्या सैनिकांवर उपचार केले जातील आणि ते बरे केले जातील आणि बरे झाल्यावर त्यांना मराठा सैन्यात सामील होण्याचा पर्याय दिला जाईल किंवा मुक्त केले जाईल. सुरवातीला महादजी या रुग्णवाहिका विभागाच्या विरोधात होते परंतु de Boigne ने या बाबतचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्या नंतर ते राजी झाला.

१७९० मध्ये मराठ्यांना राजपूत, इस्माईल बेग (मुघल + रोहिल्ला सैन्य), राठोड तसेच बिकानेर आणि जयपूर राज्य यांच्या संयुक्त आघाडीचा सामना करावा लागला. De Boigne ने बांधलेल्या सामर्थ्यशाली फलटणीमुळे मराठा सैन्याने अनेक महत्त्वाच्या लढाया जिंकल्या. या धाडसी सैन्याच्या उदयामुळे ईस्ट इंडिया कंपनीही घाबरली. १७९० च्या सहा महिन्यांत, अत्यंत प्रतिकूल प्रदेशांत त्याच्या फलटणीने १००००० सैनिकांच्या सैन्याचा पराभव केला. २०० उंट, २०० तोफ, अनेक बाजार आणि ५० हत्ती जप्त केलेत. मराठा सैन्याने १७ किल्ले जिंकले. या विजयांमुळे de Boigne ची सामाजिक, लष्करी आणि राजकीय स्थिती उंचावली. दरम्यान, त्याच्या जहागिरीत असणाऱ्या ताजमहालच्या जीर्णोद्धाराचे कामही त्याने करवून घेतले.

उत्तरेतील आपल्या चुलत भावाच्या दणदणीत यशामुळे ईर्ष्या वाटून मध्य भारतातील मराठ्यांनी (पुण्याचे पेशवे) तसेच इंदोरचे होळकर यांनी इस्माइल बेगशी (मोगल) युती करून de Boigne आणि महादजीच्या विरोधात मोहीम उघडली. De Boigne ने इस्माईलचा पराभव केला आणि त्याला तुरुंगात टाकले. त्याने होळकरांविरुद्धच्या लढायाही जिंकल्या आणि अशा प्रकारे शिंद्यांचे वर्चस्व अधोरेखित केले. त्याच्यावर खुश होऊन महादजीने त्याला आणखी मोठ्या जहागीरीचे बक्षीस दिले. एव्हान तो त्यांचा केवळ एक विश्वासू सेनापतीच नाही तर जणू उजवा हातही झाला होता. आणि आता तर तो केवळ स्वत:च्या जहागीरीचाच नव्हे तर उत्तर आणि वायव्य भारतातील संपूर्ण शाही कारभार संभाळावयास लागला.

दरम्यान, आपल्या लष्करी सामर्थ्याने आणि राजकीय वर्चस्वाने वादातीत झालेल्या शिंद्यांचे अनेक शत्रू निर्माण झालेत. कटकारस्थाने, फितुरीला पेव फुटले. पुण्यात पेशव्यांशी चर्चेसाठी आमंत्रित केलेले महादजी शिंदे नाना फडणवीस आणि होळकऱ्यांच्या जाळ्यात अडकले. शिंद्यानी de Boigne ला आपल्या बचावासाठी अधिक सैन्य पाठविण्यास सांगितले. अधिक सैन्य आले पण तोवर खूप उशीर झाला होता. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंद्यांना मारण्यात आले. शिंद्यांच्या मृत्यूनंतर de Boigne उत्तर आणि उत्तर पश्चिम हिंदुस्थानचा सम्राट बनू शकला असता पण त्याऐवजी त्याने महादजी शिंद्यांचा पुतण्या आणि वारस, दौलत राव शिंदे याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. राजकीय परिस्थिती बदलली आहे हे de Boigne ला एव्हाना उमगले होते. आणि पुढे दौलत राव शिंदे मात्र एक कमकुवत प्रशासक ठरले.

१७९५ मध्ये, भारतात १७ वर्षांच्या वास्तव्यानंतर, आपली तब्येत खालावल्याने de Boigne ने सैन्य सेनापती म्हणून आपली जबाबदारी सोडून दिली आणि त्याऐवजी आपल्या हाताखालील पियर क्विएर – पेरॉन (Pierre Cuillier-Perron) यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली आणि युरोपच्या परतीची तयारी सुरु केली. आपल्या कारकिर्दीच्या शेवटी त्याच्या हाताखाली १००००० युरोपियन शैलीने प्रशिक्षित सैन्य होते. भारतात ब्रिटिशांचा प्रतिकार करणारे, भारतीयांचे असे शिंद्यांचे हे शेवटचे सैन्य होते. मात्र युरोपला जाण्यापूर्वी त्याने आपली ५०० सैनिकांची वैयक्तिक फौज आणि मालमत्ता ब्रिटिशांना विकली.

युरोपला परतल्यावर तो लंडनला गेला. त्याने ब्रिटिश नागरिकत्व पत्करले आणि आपल्या भारतीय पत्नीपासून तो विभक्त झाले. तिथे त्याने आदलेद द ओस्मोन (Adélaïde d'Osmond) या फ्रेंच तरुणीशी लग्न केले. १८०२ मध्ये तो पॅरिसला आला आणि नापोलिआँ बोनापार्त (Napoléon Bonapart) ला भेटला. त्या बैठकीत फ्रेंच आणि रशियन सैन्याचे त्याने नेतृत्व करावे, अफगणिस्तानमार्गे भारतात पोहोचावे आणि ब्रिटिशांचा संघर्ष करावा असा प्रस्ताव Napoléon ने त्याच्या पुढे ठेवला. तथापि तोपर्यंत ५० वर्षांचे वय झालेल्या आणि गंभीर हगवणीने ग्रस्त झालेल्या de Boigne ने हा प्रस्ताव नाकारला.

१८०७ मध्ये तो शॉबेरीला परतला आणि २१ जून १८३० रोजी मृत्यूपर्यंत तो तिथेच राहिला. मृत्यूपूर्वी त्याने शॉबेरीसाठी अनेक सार्वजनिक कामांसाठी उदारपणे आपली संपत्ती दान केली. जेणेकरून हे शहर भौतिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रांत विकसित होऊ शकले.

किती अद्भुत आयुष्यकथा आहे ही! मी महाराष्ट्रातला आहे आणि ज्या काळात इतिहासाची पुस्तके फार छेडछाड न होता वाचता यायची त्या काळातले माझे शिक्षण. आणि तरीही मला आणि इतर अनेकांना असेच शिकवल्या गेले की उत्तर आणि वायव्येकडील मराठ्यांची फत्ते ही केवळ आणि केवळ मराठ्यांच्या शौर्याने शक्य झालेली!

तथापि माझ्या आठवणी प्रमाणे de Boigne ने या विजयांमध्ये बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल कुठे एक शब्द ही उच्चारला गेला नाही! आणि मला शंका आहे की आज फ्रेंच लोकांना आपल्या या शूरवीराबद्दल तरी खरेच किती माहित असावे ?


No comments:

Post a Comment

Karachi : Désordre ordonné et lutte pour la ville

Ici un entretien captivant avec le professeur Laurent GAYER de SciencePo Paris à propos de son ouvrage phare, «  Karachi : Désordre ordonné...